Thursday, June 4, 2015

जगी सर्व सुखी असा कोण आहे?

Scan-150106-0007एका जंगलात एक कावळा रहात होता. आपला प्रत्येक दिवस आनंदात, सुखात घालवत तो जगत होता. आपण अत्यंत सुखी आहोत, असं त्याला सतत वाटायचं आणि त्याच आनंदात तो जगत होता. एक दिवस जंगलातल्या तळ्याकाठी बसला असताना त्याला त्या तळ्यात पोहोत असलेला राजहंस दिसला. तो पांढराशुभ्र आणि डौलदार पक्षी पाहून तो थोडा हिरमुसला आणि विचार करू लागला, ‘मी असा काळा कुळकुळीत आणि हा पक्षी एकदम पांढरा शुभ्र, खरंच हाच जगातला सर्वात सुखी पक्षी असावा, मी उगाचंच स्वत:ला सुखी समजत होतो’, असा विचार करत करत तो त्या राजहंसाकडे गेला आणि त्याला आपल्या या भावना बोलून दाखवल्या. तो राजहंसही म्हणाला, ‘खरं आहे मित्रा तुझं, मीही स्वत:ला खूप सुखी समजत होतो.. पण एके दिवशी मी एका पोपटाला पाहिलं आणि त्यावेळी लक्षात आलं की, मला तर एकच रंग आहे. पण त्याला दोन रंग होते, खरंच तो माझ्यापेक्षा सुखी असणार रे..!!’
मग हा कावळा पोपटाच्या शोधात निघाला. एका पोपटाला गाठून त्यानं ही सगळी कथा त्याला ऐकवली. तो पोपट हसत म्हणाला, ‘माझा ही समज असाच होता, की खरंच मीच सुखी आहे. पण एके दिवशी मी एका मोराला पाहिलं आणि मला जाणवलं की, संपूर्ण पृथ्वीवर तोच सगळ्यात सुखी पक्षी आहे. कारण त्याच्या अंगावर अगणित सुंदर रंगछटा आहेत.’
पोपटाचं हे वर्णन ऐकून कावळा अजून संभ्रमित झाला. आता तो मोराच्या शोधात निघाला. एका प्राणी संग्रहालयात एका पिंज-यात त्याला एक मोर दिसला. शेकडो लोक त्याच्या भोवती गोळा होऊन त्याचं गुणगान करत होते. आता कावळ्याला खात्री पटली की, हाच जगातला सर्वाधिक सुखी पक्षी आहे. काही वेळाने सर्व लोक निघून गेल्यावर हा कावळा त्याच्या पिंज-याजवळ गेला आणि आत्तापर्यंत झालेला सगळा घटनाक्रम त्याला ऐकवला आणि म्हणाला, ‘मयुरराज, आपण खरंच किती किती सुंदर आहात, रोज हजारो लोक तुम्हाला पाहायला येतात आणि तुमची स्तुती करतात, मला मात्र कुठे गेलं की, हुसकावून लावतात, आपण सगळ्यात सुखी पक्षी आहात या भूतलावर!!’
खिन्न मुद्रेनं हसत तो मोर म्हणाला, ‘मला ही मी सगळ्या पक्ष्यांपेक्षा सुंदर आणि सुखी पक्षी असल्याचा अभिमान होता मित्रा.. पण माझ्या या सौंदर्यामुळेच मी पिंज-यात अडकलोय आणि शोभिवंत वस्तू बनून राहिलोय. तू सगळं प्राणी संग्रहालय फिरून बघ, तुला इथे सगळे पक्षी दिसतील पण कोणत्याही पिंज-यात एकही कावळा दिसणार नाही कुठे.. आणि त्यामुळे सध्या मी असा निष्कर्ष काढतोय, की कावळा हा पृथ्वीवरचा सर्वात सुखी पक्षी आहे. कारण तो त्याच्या मर्जीनं कुठेही उडून जावू शकतो..!!’
तात्पर्य काय मित्रांनो??
आपण नेहमी अशी समजूत करून घेऊन वावरत असतो की, आपले नातेवाईक, मित्र, सहकारी, आजूबाजूचे लोक हे आपल्यापेक्षा जास्त सुखी आहेत. पण प्रत्यक्षात मात्र काही वेगळंच असतं. आपण आपल्या परिस्थितीची तुलना कारण नसताना दुस-याशी करतो आणि स्वत:ला दु:खी करून घेतो. आपल्यात उपजत असलेले गुण, आपली सुखं याचा आपल्यालाच विसर पडून दुस-याचे गुण आणि सुख आपल्याकडे नाही, म्हणून आपण दु:खं करत बसतो. आपल्याप्रमाणेच त्याच्याही आयुष्यात काही दु:खं असतील, असा विचार आपल्या मनाला शिवतही नाही आणि एकांगी विचाराने आपलं सुरळीत चाललेलं सुखी आयुष्य नीरस करून घेतो.
आजकाल स्वत:च्या दु:खापेक्षा दुस-याच्या सुखाने माणसं जास्त दु:खी व्हायला लागली आहेत. ‘भला उसकी कमीज मेरी कमीज से सफैद कैसे?’ या प्रश्नाचं उत्तर शोधण्यातच आपल्या आयुष्यतले अमूल्य क्षण आपण घालवतोय.
प्रत्येकाला त्याच्या त्याच्या परीनं सुख आणि दु:खं दोन्हीही आहे. इतरांच्या नशीबाशी आपल्या नशीबाची तुलना करण्यापेक्षा आपलं सुख कशात आहे, हे शोधा आणि ते प्राप्त करण्यासाठीचे प्रयत्न वाढवा, कारण समर्थ रामदास स्वामींनी मनाच्या श्लोकांमध्ये म्हटलंय,
‘जगी सर्व सुखी असा कोण आहे?
विचारी मना तूच शोधोनि पाहे..।।’
सर्वाना सुखी आणि आनंदी जीवनासाठी शुभेच्छा!!

0 Comments:

Post a Comment

Subscribe to Post Comments [Atom]

<< Home