Wednesday, June 10, 2015

गंध हरवला मातीचा..
मातीत जिवंतपणा अलीकडे नाहीसा झाला आहे. तो संपत चालला आहे.?पावसाचे नियमित अवेळी येणे हे जसे वाढले आहे.?तसेच मातीलाही खतांचा डोस दिला जाऊ?लागल्याने तिचे मूळचे सौंदर्य?नाहीसे होऊ लागले आहे. लाल मातीतला पहिल्या पावसाबरोबर हवा-हवासा वाटणारा गंध आता नाकापर्यंत पोहोचत नाही.?शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणारे अ‍ॅक्टिनोमायसिटीस जमिनीत त्यांना हवे ते अन्न न मिळाल्यामुळे मृत्यूच्या वाटेवर प्रवास करू लागले. त्यामुळे पहिल्या पावसाचा गंध हरवला आहे.
पूर्वी मृगाच्या पहिल्या सरी पडल्या की भिजलेल्या मातीचा सुगंध सर्व आसमंतात पसरत असे. गेली दोन दशके पहिल्या पावसात मातीस येणारा गंध कुणी अनुभवला आहे का? उत्तर अर्थात नाहीच असणार.
ज्या मातीत पहिल्या पावसात जास्त गंध सुटतो, ती माती अधिक सुपीक असते. अशा जमिनीतून भरपूर उत्पादन मिळते. पोटात ओलावा साठवून ठेवणारी आणि कणांना घट्ट धरून ठेवणारी ही माती ह्युमसने समृद्ध असते. नत्र आणि कर्बाचे प्रमाणही या मातीत अधिक असते. आपण म्हणाल, की मातीच्या गंधाचा आणि उत्पादनाचा काय संबंध? हेच तर विज्ञान आहे,जे आपल्या सर्वानाच समजून घेणे आवश्यक आहे. पहिल्या पावसानंतर मातीस येणारा सुगंध ,शिवारात पसरलेला सुवास हा अ‍ॅक्टिनोमायसिटीस या जमिनीमध्ये असणा-या तंतुमय जीवाणूपासून उत्पन्न झालेला असतो. निसर्गाने शेतक-यांना सेंद्रिय शेतीसाठी भेट दिलेला हा परोपकारी जीवाणू खेळती हवा असणा-या जमिनीच्या वरच्या थरामध्ये मोठय़ा प्रमाणात आढळतो.
जमिनीचा घट्ट काळा रंग ह्युमसमुळे असतो आणि अ‍ॅक्टिनोमायसिटीसमुळेच ह्युमसची निर्मिती होते. जमिनीचे काळी आई हे नावसुद्धा याचमुळे. वनस्पतीजन्य सेल्युलोज, लिग्निन आणि मृत कीटकांच्या टणक आवरणामधील ‘कायचीन’ हे या जीवाणूंचे मुख्य खाद्य. जमिनीमध्ये या सर्व घटकांचे ते पूर्ण विघटन करून त्यातील मूलद्रव्ये पिकांच्या मुळांना सहज उपलब्ध करून देण्याचे त्यांचे कार्य अव्याहत चालू असते.
अ‍ॅक्टिनोमायसिटीसमुळेच पिकांची वाढ जोमाने व निरोगी होते आणि ती सुद्धा कमी पाण्यात, फक्त ओलाव्याच्या साहाय्यानेच. खरीपानंतर रब्बीचे पीक आणि त्यानंतर काढणी झाली की उन्हाळा सुरू होतो. जमिनीमधील ओलावा कमी होतो आणि अ‍ॅक्टिनोमायसिटीसचे रूपांतर सूक्ष्म गोल कणांमध्ये होते. कोरडय़ा चिमूटभर मातीत असे लाखो जिवंत गोल कण असतात.
पहिला पाऊस पडला की हे कण जमिनीमध्ये लगेच रूजतात, व त्यांच्या नवीन जीवन प्रवासाची सुरुवात होते. पहिल्या वळणाच्या अथवा मृगाच्या पावसाच्या टपो-या थेंबांनी मातीचे कण उडतात, त्याचबरोबर अ‍ॅक्टिनोमायसिटीसचे सूक्ष्म कणही हवेत दूरवर पसरतात. आणि त्यांचा सुवास सर्वत्र दरवळत राहतो. व्हॅनिला अथवा अत्तरासारखा हा सौम्य गंध मातीतून निर्माण झालेला असतो. म्हणून तो मृदगंध. या गंधावरून हे सिद्ध होते की, जमिनीमध्ये अ‍ॅक्टिनोमायसिटीस भरपूर आहेत म्हणजेच मातीमध्ये सेंद्रिय पदार्थ मोठय़ा प्रमाणावर आहेत. त्यामुळे खरीप व रब्बीचे पीक अमाप येणारच. अ‍ॅक्टिनोमायसिटीसचा गंध फक्त एकदाच आणि तोही पहिल्या पावसातच येतो. बाकी वर्षभर हा जीवाणू शेतक-यांच्या सेवेत स्वत:स जमिनीखाली गाडून सतत कार्यरत असतो. उन्हाळा सुरू झाला, उष्णता वाढली की, तो सूक्ष्म कणांमध्ये रूपांतरित होतो. जगण्यासाठी या जीवाची ही एक धडपडच असते. आता रासायनिक खतांचे डोस सुरू झाले. बरोबर कीटकनाशकेही आली आणि शेतक-यांची हजारो वर्षे सेवा करणारे अ‍ॅक्टिनोमायसिटीस जमिनीत त्यांना हवे ते अन्न न मिळाल्यामुळे मृत्यूच्या वाटेवर प्रवास करू लागले. पहिल्या पावसाचा गंध हरवू लागला. जमिनीमध्ये वनस्पती आणि कीटकांचे अवशेष सडू लागले. ते खाण्यासाठी वेगळीच कीड तयार होऊ लागली. पहिल्या पावसात वावरणारे अनेक छोटे-छोटे जीव नष्ट झाले.?यातच मृग किडेही दुर्मीळ झाले. तिला नष्ट करण्यासाठी नवनवीन कीटकनाशके  बाजारात आली आणि जमिनीच्या नैसर्गिक पोताचा सर्वनाश झाला. काळय़ा आईची रयाच बदलली.?जसा शेतातला मृद्गंध नाहीसा झाला.?तसाच जंगलावरही निसर्गबदलाचा परिणाम झाला.?एकूणच सृष्टीचक्र बदलले मग माती तरी तशीच कशी राहील?

No comments:

Post a Comment